अतिरेक्यांचं टार्गेट होतं मलबार हिल
Saturday, 18 April 2009
मुंबईवरील हल्ल्याप्रसंगी पोलिसांच्या तावडीत सापडलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांचा सीएसटीमध्ये गोळीबार करून मलबार हिलचा 'व्हीआयपी' परिसरात गाठण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती शनिवारी म्हणजेच १८ एप्रिल २००९ ला विशेष कोर्टापुढे झालेल्या सुनावणीदरम्यान सामोर आली. मलबार हिल परिसरात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, हायकोर्टाचे न्यायमूर्तींसह विविध महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने आहेत. सीएसटी परिसरात दहशत माजवल्यानंतर हे दोघेजण कामा हॉस्पिटलच्या गल्लीतून नरिमन पाइंटच्या दिशेने गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना गाठायचा होता तो थेट मलबार हिलचा व्हीआयपी परिसर! त्या परिसरात ते नेमके काय करणार होते, हे कदाचित गुलदस्त्यातच राहील. कारण हा व्हीआयपी परिसर गाठण्याचा कट ज्याच्या डोक्यात शिजत होता, तो अबू इस्माईल पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. २६/११च्या हल्ल्याची सुनावणी न्या. एम. एल. तहिलियानी यांच्यापुढे आर्थर रोड तुरुंगातील विशेष कोर्टात सुरू आहे. कसाबचा सहभाग स्पष्ट करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सीएसटी फायरिंगचा उल्लेख केला. या हल्ल्याविषयी तपशीलवार सांगताना कसाबच्या कबुलीजबाबाचा आधार घेत त्यांनी ही बाब उघड केली. सीएटीनंतर तुमचा कुठे जाण्याचा प्लॅन होता, असे कसाबला चौकशीदरम्यान विचारले असता त्याने 'मलबार हिल' असे उत्तर दिले. तिथे काय करणार होता, या प्रश्नावर त्याने इस्माईलचे नाव सांगितले. आपणही इस्माईलला सीएसटीनंतर कुठे जायचे, असे विचारले होते. त्यावर त्याने 'मलबार हिल', असे उत्तर दिले. वहा क्या करना है, असे कसाबने विचारले असता इस्माईलने 'वहा पहुचने के बाद बताऊगा,' असे उत्तर दिले. या खटल्यामध्ये एकूण १,८२० साक्षीदारांपैकी ३३ प्रत्यक्षदर्शी १०३ साक्षीदारच तपासण्यात येणार आहेत. यात एफबीआयच्या काही परदेशी तज्ज्ञांच्या साक्षींचाही समावेश आहे.
0 comments:
Post a Comment