कसाबची मुक्ताफळे...

Friday, 29 May 2009



उज्ज्वल निकम- क्यू कसाब तुम हसते क्यू रहते हो, नौंटकी क्यू करते हो ?
कसाब- मै कुछ नही करता हूं.

उज्ज्वल निकम- तुने इतने लोगों को मारा है और तुम हस रहे हो ?
कसाब- मैने...मैने किसी को नही मारा..तुम झूठ बोल रहे हो.

उज्ज्वल निकम- तो मै क्या झूठ बोल रहा हूं ?
कसाब- जाने दो ना सहाब मैरा फैसला कोर्ट करेगा.
कोणालाही मारलेले नाही. तुम्हीच खोटे बोलत आहात

ही फळं आहेत आपल्या उदारमतवादाची. कसाबविरूद्ध कायदेशीर मार्गाने खटला चालावा, त्याला कायदेशीर मार्गाने शिक्षा दिली जावी या विचारसरणीमुळे आज पाकिस्तानमधला एक अतिरेकी मुंबईत येऊन आपल्या वकीलांना उद्धटपणे उत्तर देतो. हे चित्र दुसरीकडे कुठेही पहायला मिळणार नाही. न्यायाधीश एम.एल.तहिलयानी हे कोर्टामध्ये येण्यापूर्वी निकम आणि कसाब यांच्यात हा संवाद झाला. ज्यातून कसाबच्या अंगात किती मस्ती आहे हे दिसून येतं. याआधी सुनावणीदरम्यान तुकाराम ओंबळेंचं नाव निघाल्यावर दात काढणा-या कसाबचे दात घशात घालणं गरजेचं आहे. विनाकारण हसणा-या कसाबला न्यायालयाने वेळोवेळी समज दिली आहे. दरम्यान, गिरगाव चौपाटीवरील चकमकीत ठार झालेल्या अबू इस्माईलकडून मिळालेला नकाशा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला. त्याआधी त्यातील ठिकाणांच्या नावाभोवती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत मर्दे यांनी लाल पेनने गोलाकार केले होते व तो नकाशा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविला होता. त्याबाबतच्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.

कसाब एक चिंधी चोर

Wednesday, 27 May 2009


मुंबईवर हल्ला करणारा कसाब जिहादी वैगरे नसून तो पैश्यांसाठी हावरा असलेला एक चिंधई चोर असल्याचं एका घटनेवरून स्पष्ट झालं. चकमकीत अबू इस्माईलला ठार केल्यानंतर त्याच्याकडून काही पैसे हस्तगत करण्यात आले होते. साक्षीदरम्यान तपास अधिकारी या पैशांची ओळख पटवत असताना कसाब पैश्यांकडे असा काही पहात होता, की त्याच्या तोंडातून केव्हाही लाळ गळेल असं वाटत होतं. ही बाब जज एम.एल तहिलयानी यांच्याही निदर्शनातून सुटली नाही. तहिलयानी लगेच उद्गारले की अरे " ते पैसे लपवा, जर कसाबने हे पैसे पाहिले तर तो रडायला लागेल आणि माझे पैसे मला परत द्या असा हट्ट करेल " तहिलयानी यांच्या या वाक्यानंतर कोर्टात असा एकही मनुष्य नव्हता जो हसला नाही. याआधीही कसाबने मला अटक करताना माझ्याकडे असलेले ५ हजार ४०० रूपए जप्त करण्यात आले होते, त्या पैश्यांचं काय झालं असा सवाल कसाबने विचारला होता. कोर्टामध्ये गिरगांव चौपाटी चकमकीप्रकरणी कसाबविरुद्ध पहिल्यांदा खुनाचा गुन्हा दाखल करून घेणारे डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी विनोद सावंत यांची साक्ष नोंदविण्यात आली.

२९ दिवस ३० साक्षीदार...

Tuesday, 26 May 2009


खटल्याला बुधवारी म्हणजेच २६ मे रोजी २९ दिवस पूर्ण झाले. या २९ दिवसांमध्ये न्यायालयामध्ये तब्बल ३० साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली. बुधवारी भरत तामोरे यांनी कोर्टामध्ये साक्ष नोंदवण्यात आली. तामोरे यांनी २६ नोव्हेंबरला कसाब आणि त्याच्या साथीदारांना बधवार पार्क इथे उतरताना पाहीलं तामोरे यांनी या दहा जणांना पाहून प्रश्न विचारला होता की तुम लोग कहॉं से आये हो यावर सर्वात पुढे असलेल्या कसाबने, हम स्टुडंट हैं असं उत्तर दिलं. कसाबचा साथीदार अबू ईस्माईलने उद्धटपणे तुमको क्या करना है असं तामोरेंना उत्तर दिलं. बधवार पार्क इथे उतरलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे आठ जणांच्या पाठीवर सॅक व हातात काळी हॅण्डबॅग होती. तामोरे न्यायालयात बसलेल्या कसाबला ओळखलं. तामोरे यांनी यापूर्वी अबू इस्माईलच्या मृतदेहाची ओळखही पटवली आहे. तामोरे ताज हॉटेलमध्ये काम करतात, ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशीही ते कामावर गेले होते. मात्र त्यांना कल्पना नव्हती की ज्यांना त्यांनी हटकलं होतं त्यांपैकीच काही जणांनी मुंबईत हल्ला केलाय. तामोरे यांच्याव्यतिरिक्त प्रशांत धनू या तरूणानेही साक्ष नोंदवली. साक्षीदरम्यान त्याने कोर्टात दाखवण्यात आलेली काळ्या पिवळ्या रंगाची रबरी डिंगी (छोटी बोट) ओळखली. याच डिंगीतून सर्व अतिरेकी मुंबईच्या किना-यावर आले होते.

मला परत सदस्यत्व द्या हो...

Thursday, 21 May 2009




कसाबचे वकील अब्बास काझमी यांचं सदस्यत्व इस्लामिक जिमखान्याने रद्द केलं. याला काझमी यांनी विशेष कोर्टामध्ये आव्हान दिलंय. काझमी यांनी आपल्या अर्जात जिमखान्याने कोर्टाचा अवमान केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे केली. कसाबचे वकील म्हणून विशेष न्यायालयाने त्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आपल्यावर सोपविलेले काम आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. परंतु विश्वस्त मंडळावरील सदस्यत्व रद्द करून आणि विविध आरोप करून जिमखान्यातर्फे आपल्याला या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केरत आहे असा आरोप काझमी यांनी केलाय. त्यामुळे जिमखान्याच्या अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी करावी, अशी मागणी अ‍ॅड. काझ्मी यांनी केली आहे. दरम्यान, कसाब व अन्य आरोपींविरुद्ध भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा मुख्य आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र या त्यात जम्मू आणि काश्मीर मिळविण्यासाठी हल्ला केला गेल्याचे नमूद नाही. त्यामुळे ते त्या आरोपांच्या कारणांमध्ये नमूद करावे, अशी मागणी आज अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी एका अर्जाद्वारे केली. आरोपांमध्ये अभियोग पक्षाने प्रस्तावित केलेले सर्व तपशील येणे गरजेचे नाही. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरसाठी हल्ला केल्याचे आरोपात नमूद नसले तरी फारसा पडक पडणार नसल्याचे न्या. टहलियानी यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र निकम यांच्या विनंतीनंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज दाखल करून घेतला

कसाब बोगस आहे...

Tuesday, 19 May 2009


विशेष कोर्टामध्ये हैद्राबादच्या अरूणोदय पदवी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल जी.राधाकृष्णन यांना बोलावण्यात आलं. कसाब आणि त्याच्या इतर सहा साथीदारांकडे सापडलेली अरूणोदय कॉलेजची आय.डी बोगस असल्याचं राधाकृष्णन यांनी कोर्टाला सांगितलं. राधाकृष्णन यांच्यासह कोर्टात पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात नायर रुग्णालयातील मुख्य आणि सहाय्यक नोंदणी अधिकारी तसंच अबू इस्माईलकडून सापडलेला बॉम्ब चौपाटी येथे निकामी करतेवेळी उपस्थित असलेल्या पंचाचा समावेश होता. याशिवाय अबू इस्माईलच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि पोलीस उपनिरीक्षक भास्कर कदम यांची सर्व्हीस रिव्हॉल्व्हर जप्त करणा-या पंचाचीही या साक्ष नोंदविण्यात आली. राधाकृष्णन यांनी साक्षीदरम्यान अरुणोदय पदवी कॉलेजमध्ये केवळ आंध्र प्रदेशमधील विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतात असं सांगितलं. तसंच आय.डी.वर प्राचार्य म्हणून माझी विद्यार्थ्यांची सही गरजेची असते आणि आय.डी कॉम्प्युटरच्या मदतीने बनवलं जात. अतिरेक्यांकडे सापडलेली आय.डी ही हाताने बनवली असल्याचं राधाकृष्णन यांनी कोर्टाला सांगितलं.

फहिमच होता अतिरेक्यांचा "मार्ग"दर्शक

Monday, 18 May 2009




आत्तापर्यंत खटल्यामध्ये फक्त कसाब एके कसाब असंच चालू होतं. इतर दोन आरोपींबाबत काहीच ऐकू येत नव्हतं. मात्र १८ एप्रिलला एका पंचाने फहिमने हल्ल्यामध्ये कशी भुमिका बजावली हे कोर्टाला सांगितलं. पाकिस्तानी दहशतवाद्यांना टार्गेट पर्यंत पोचता यावं यासाठी फहिम ने नकाशे तयार केले होते. गिरगांव चौपाटीवर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अबू इस्माईलकडून सीएसटी, चौपाटी, मलबार हिल या ठिकाणांपर्यंत पोहोचण्याची दिशा दाखविणारे नकाशे सापडले होते. त्यामुळे फहिमची कटामध्ये महत्वपूर्ण भुमिका असल्याचं विशेष सरकारी वकीलांनी कोर्टाला सांगितलं. अबू इसमाईलच्या मृतदेहाचा आणि कसाबच्या कपड्यांचा पंचनामा करणारे शिवाजी शिवलेकर यांनी या नकाश्यांबाबात कोर्टावला मिहीती दिली. अबू इस्माईलच्या खिश्यातून चुरगळलेला कागद सापडला होता ज्यावर काही ठिकाणांची नावं लिहली होती तो कागद शिवलेकर यांनी कोर्टात ओळखला. कसाबच्या कपडय़ांच्या पंचनाम्यादरम्यान बंगळुरू येथील महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडलं होतं. समीर चौधरी नावानं असलेल्या या आय.डी.वर कसाबचा फोटो होता. शिवलेकर यांनी कोर्टामध्ये असलेल्या कसाबची ओळख पटवली. शिवलेकर यांच्याशिवाय शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या मृतदेहाचा आणि त्यांच्या कपडय़ांचा पंचनामा करणा-या राजा वसईकर यांचीही साक्ष नोंदविण्यात आली. २६ / ११ च्या रात्री शिवलेकर यांनी आपल्या मित्राला अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी नायर हॉस्पीटलमध्ये गेल्याचं कोर्टाला सांगितलं. यावर फहिमचे वकील शाहीद आझमी यांनी शिवलेकर खोटं बोलत असल्याचा. ज्या मित्रासोबत शिवलेकर हॉस्पीटलमध्ये गेले त्याला न कळविताच ते रुग्णालयातून परस्पर घरी का गेले असा सवाल आझमी यांनी केला. शिवलेकर त्या रात्री रुग्णालयात गेलेच नव्हते, तर मित्राला पाहायला गेले होतो, असे ते खोटे सांगत आहेत, असा आरोपही आझमी यांनी केला. पोलिसांनी तयार केलेल्या पंचनाम्यावर शिवलेकर यांनी नंतर सही केल्याचं आझमी यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व आरोप शिवलेकर यांनी फेटाळून लावलेत

काझमींना झाला कसाबचा खटला डोईजड...

Sunday, 17 May 2009




अब्बास काझमी....अतिरेकी अजमल आमीर कसाबचे वकील... मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याशी निगडीत खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कोर्टाच्या कार्यपद्धतीबद्दल काझमी नाराज आहेत. खटल्यातील एक पंच शशिकांत पवार यांच्या वयाबाबत काझमी युक्तीवाद करत असताना न्यायाधीश एम.एल. तहिलयानी आणि काझमी यांच्यात खटका उडाला. यावर आपल्याला कसाबची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जात नसल्याची तक्रार काझमी यांनी न्यायाधीशांकडे केली. यावर तहिलयानी यांनी काझमी यांना जर तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर तुम्ही खटला सोडू शकता असं सांगितलं. यावर भडकलेल्या काझमी यांनीही मी खटला सोडतो असं सांगितलं. काझमी यांनी खटल्यातून अंग काढून घेतलं तर न्यायालयीन कामकाजाचा आणकी वेळ वाया जाईल हे लक्षात आल्यानंतर न्यायाधीश एम.एल .तहिलयानी यांनी समजुतीने प्रकरण शांत केलं. यानंतर सरकारी वकीलांनी आणखी तीन साक्षीदार कोर्टासमोर हजर केले. या तिघांनीही कसाबला ओळखलं. या तिघांच्या साक्षीदारांच्या साक्षीनंतर पोलीस निरीक्षक भास्कर सावंत यांनी पुन्हा साक्षीसाठी कोर्टात बोलावण्यात आलं. गिरगांव चौपाटीवर झालेल्या चकमकीनंतर मिळालेल्या आयकार्डवरील फोटो हा अभू ईस्माईलचा होता असं सांगितलं. अबू ईस्माईल कसाबचा साथीदार होता ज्याला मुंबई पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं.

पाकिस्तान्यांनो जरा ऐका हे

Wednesday, 13 May 2009

मुंबईवर हल्ला करणारे पाकिस्तानी नव्हते अशा छातीठोक दावा करणा-या आणि नंतर आपल्या विदानापासून पलटणा-या पाकिस्तान्यांनी जरा डी.बी.मार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग गावडे यांची कोर्टातली जबानी एकदा ऐकावी. गावडे यांनी जखमी कसाबला आणि त्याच्या साथईदाराला नायर हॉस्पीटलमध्ये नेलं होतं. यावेळी त्यांना कसाबने त्याच्या वयाबरोबर तो पाकिस्तानचा असल्याचंही सांगितलं होतं (आता आणखी किती पुरावे द्यावेत ? ) गावडे यांच्या व्यतिरिक्त कोर्टामध्ये १३ मे रोजी आणखी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात वायरलेस ऑपरेटर सुधीर देसाई अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना नायगांवच्या शस्त्रागारातून शस्त्र देणारे अतिरिक्त सहाय्यक निरीक्षक अरूण जांदे आणि संजय जाधव यांचीही साक्ष नोंदवण्यात आली.

तो कसाबच होता....

Tuesday, 12 May 2009

भास्कर सावंत यांच्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर आणि सहाय्यक उपनिरीक्षक हेमंत बावधनकर यांनीही कसाबला ओळखलं. बावधनकर यांनी आपण कसाबकडून एके-४७ रायफल हिसकावून घेताना जखमी झाल्याचं कोर्टाला सांगितलं. बावधनकर यांनीच कसाबचा साथीदार अबू इस्माईलला गोळीबार करून जखमी केलं होतं. हे सगळं कोर्टात सुरू असताना कसाब ह्यॅ....ह्यॅ करून हसत होता. यावर न्यायाधीश एम.एल.तहिलयानी यांनी कसाबकडे एकदा बघितलं आणि त्याला पुन्हा एकदा झापलं. न्यायधीशांनी तू का हसतो असं विचारलं असता त्याने मिडीयाचे लोकं हसवतात असं सांगून मिडीयाच्या नावावर बिल फाडण्याचा प्रयत्न केला. मात्र खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा सुनावणी दरम्यान शहीद पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांचं नावं घेतलं गेलं तेव्हा तेव्हा कसाब हसताना दिसलाय.
बावधनकरांच्या साक्षीनंतर संजय गोविलकर यांनी कोर्टापुढे साक्ष दिली. कसाबने केलेल्या गोळीबारात जखमी झाल्यानंतरही हातात शस्त्र नसताना कसाबला कसं जेरबंद केलं याचा अनुभव सांगितला. या दोघांच्या साक्षी झाल्यानंतर कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी उलटतपासणीत या दोन्ही
अधिकार-यांनी सांगितलेल्या बाबी खोट्या असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला

पहिल्या साक्षीदाराने नोंदवली साक्ष

Saturday, 9 May 2009




ती काळरात्र आठवताना पहिल्या साक्षीदाराच्या अंगावरही काटा आला असेल. मुंबई हल्ला प्रकरणात विशेष कोर्टामध्ये ८ मे रोजी पहिल्या साक्षीदाराने आपली साक्ष नोंदवली. हा साक्षीदार दुसरा तिसरा कोणी नसून गिरगांव चौपाटीवर घटनेच्या दिवशी हजर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर सावंत होते. सावंत यांनी कसाबकडे बोट दाखवत हाच तो दहशतवादी आहे ज्याने शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना ठार केलं. कसाबला पाहताना सावंत यांच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग पुन्हा एकदा आला असेल. त्यांनी त्या रात्री जे काही घडलं ते कोर्टाला सांगितलं. कदम यांनी जेव्हा कसाबला बघितलं


तेव्हादेखील कसाब त्याच्या नेहमीच्या मठ्ठ स्टाईलमध्ये हसत होता. त्या चक्रमाला माहितही नव्हतं की समोरचा माणूस काय बोलतोय. तरीही ते येडं हसतच होतं. कदम यांनी कोर्टाला सांगितलं की ज्या दिवशी हल्ला झाला तेव्हा ते रात्रपाळीला होते. हल्ल्याच्या माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कदम मरीन ड्राईव्हवरील ‘कॅफे आयडियल’समोर नाकाबंदीसाठी चौपाटीवर आले. तिथे ओंबळे आणि स.पो.नि संजय गोविलकरदेखील पोचले. त्याचवेळी कंट्रोल रूममधून मेसेज आला की एक स्कोडा कार विधानभवन इथून चौपाटीकडे येत आहे. ती गाडी जवळ येताच सगळ्यांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र थोडावेळी थांबून गाडीचालकाने पुन्हा भरधान वेगाने गाडी दक्षिण मुंबईकडे वळविण्याचा प्रयत्न केला,पण त्यांची गाडी डिव्हायडरवर आदळली. त्याचबरोबर कदम गाडीचालकाच्या दिशेने पुढे सरकले. गाडीचालकाने खिडकीतून कदम यांच्यावर गोळीबार केला. कदम यांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्याचवेळेस चालकाच्या बाजूला बसलेला दहशतवाद्याने गाडीचे दार उघडून रस्त्यावर पडल्याचे सोंग केले. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी ओंबळे पुढे सरसावले. पण त्याच्या हातात एके-४७ दिसताच त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्या दहशतवाद्याने ओंबळेंवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर गोविलकर यांनी त्या दहशतवाद्याच्या हातातील रायफल हिसकावून घेतली. त्यानंतर अन्य पोलिसांनी त्या दहशतवाद्याला चोपले व ताब्यात घेतले. हा सगळा प्रसंग कदम यांनी कोर्टाला सांगितला.

७ लोकांच्या खुन्याला आरोप मंजूर नाही...

Thursday, 7 May 2009

सात लोकांची हत्या करणा-या आणि साथीदारासह ७२ वोकांना मारणा-या कसाबविरुद्ध कोर्टाने ८६ आरोप निश्चित केलेत. कसाब, फहिम आणि सबाउद्दीन यांच्याविरुद्ध भारताविरुद्ध युद्ध पुकारून १६६ जणांची हत्या केल्याचा आरोप विशेष सत्र न्यायालयाने निश्‍चित केला. या तिघांव्यतिरिक्त पाकिस्तानातील ३५ फरार आरोपी (यातील सहा आरोपी पाकिस्तामध्ये अटकेत आहेत) यांच्यासह ठार करण्यात आलेले ९ दहशतवादी अशा एकूण ४७ जणांविरूद्ध आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. कसाबला कोर्टाचे कामकाज समजावं म्हणून न्यायाधीक्ष तहिलयानी यांनी मुद्दाम ऊर्दूमिश्रीत हिंदी शब्दांचा वापर केला. कसाब, फहिम आणि सबाउद्दीन विरूद्ध भारतात आणि भारताबाहेर कटकारस्थान करून भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी प्रशिक्षण घेणे आणि अतिरेकी कारवाया करणे, असे आरोप ठेवण्यात आलेत. याशिवाय कसाबवर २४ स्वतंत्र आरोप निश्चित करण्यात आलेत. यात छ.शि.ट स्थानकात गोळीबार, कुबेर जहाजावरील तांडेलची हत्या, कामा रुग्णालय, कामा रुग्णालय परिसर, गिरगाव चौपाटी चौपाटीवर लोकांची हत्या करणे आणि , माझगांवमध्ये टॅक्‍सीत घडविलेला बॉम्बस्फोट अशा आरोपांमध्ये कसाबने प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचं कोर्टाने मान्य केलंय. फहीमवरही स्वतंत्रपणे दोन आरोप ठेवण्यात आलेत. बोगस नाव घेऊन संगणक केंद्रात प्रवेश घेणे आणि रिलायन्स मोबाईलचे सिम कार्ड बनावट नावाने घेतल्याच्या आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. कसाबला आरोपांबाबत जेव्हा कोर्टाने विचारलं तेव्हा त्याने मठ्ठ चेह-याने मला आरोप मान्य नाहीत म्हणून सांगितलं. त्याचाच पदर धरत फहिम आणि सबाउद्दीनही आरोप मान्य नाही म्हणून पिपाणी वाजवायला सुरवात केली.

६ मे कसाबसाठी घातवार...

Tuesday, 5 May 2009


६ मे कसाबसाठी घातवार ठरणार आहे....कारण ६ मे म्हणजे बुधवारी कसाब आणि त्याच्या साथादारांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात येणार आहे. ४ मे रोजी विशेष कोर्टाचे न्यायाधीश एम.एल तहिलयानी यांनी एक दिवसानंतर म्हणजेच ६ मे रोजी आरोप निश्चित करणार असल्याचं स्पष्ट केलं. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ३५ फरार आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढावं अशी मागणी केली. निकम यांनी कोर्टाला आणखी एक विनंती केली. कसाबचा कबुलीजबाब, दहशतवाद्यांमध्ये सॅटेलाईट फोनद्वारे झालेल्या संभाषणाचा मसूदा ही आणि अशी अन्य कागदपत्र आपल्याला दिली जावीत अशी मागणी निकम यांनी केली. ही कागदपत्र पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांविरुद्ध पुरावा म्हणून वापरली जाणार आहेत. दरम्यान फहिम अन्सारीचे वकील शाहिद आझमी यांनी प्रस्तावित आरोपावर युक्तीवाद करताना कश्मीर हा भारताचा भागच नसल्याचं सांगितलं. याला आधार म्हणून त्यांनी भारतीय दंडविधान च्या कलम १८ चा दाखला दिला. ज्यात भारत म्हणजे जम्मू कश्मीर वगळता इतर प्रदेश अशा स्वरूपाची व्याख्या केलेली आहे. कसाबने दिलेल्या कबुलीजबाबात कश्मीर स्वतंत्र करण्यासाठी भारतावर हल्ला करायचा होता अशी माहिती दिलीव होती. हाच धागा पकडत आझमी यांनी जम्मू कश्मीर जर भारताचा भागच नाहीये तर मग फहिमवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपच लागू शकत नाही असा युक्तीवाद कोर्टात केला.

"बाल" युक्तीवाद फोल ठरला....

Saturday, 2 May 2009

मुंबईवर हल्ला करतेवेळीस कसाब हा २१ वर्षांपेक्षा अधिक वयाचा होता असा निर्वाळा विशेष कोर्टाने दिलाय. सरकारी पक्षाने कोर्टामध्ये सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे कोर्टाने हा निकाल दिलाय. कसाबचं वय निश्चित करण्यासाठी त्याच्या हाडांची आणि दातांची चाचणी करण्यात आली होती. या चाचण्यांचे अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे सरकारी पक्षाने कोर्टासमोर सादर केले होते. सरकारी वकीलांनी कोर्टामध्ये दोन साक्षीदार उपस्थित केले होते. यात आर्थर रोड तुरुंग अधीक्षक स्वाती साठे आणि कसाबला अटक केल्यानंतर त्याच्यावर सर्वात पहिल्यांदा उपचार करणारे डॉक्टर वेंकट राम मूर्ती यानी कोर्टामध्ये साक्ष दिली. निकाल देतेवेळीस कोर्टाने कसाबचे वकील अब्बास काझमी यांचे युक्तीवाद का फेटाळून लावले याचं कारणही दिलं. काझमी यांचा युक्तीवाद आणि त्यावर कोर्टानं काय स्पष्टीकरण दिलं हे पाहूयात

काझमी- नायर हॉस्पीटलमध्ये तयर करण्यात आलेल्या केस पेपरच्या मुख्यपृष्ठावर वय २५ लिहलंय आणि आतल्या कागदांवर त्याचं वय वेगळं लिहलंय असं का ? या रेकॉर्डमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम.एल.तहिलयानी- पोलिसांनी ज्यावेळी कसाबला नायर हॉस्पीटलमध्ये नेलं तेव्हा त्यांना कसाबचं नाव किंवा त्याचं वय माहीत नव्हतं. इतकंच नाही तर शहरात किती दहशतवादी आहेत आणि त्यांनी कुठे हल्ला केलाय याचीही त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे अशा त्रुटी समजण्यासारख्या आहेत.

काझमी- कसाबच्या तुरुंगातील रेकॉर्डमध्ये त्याच्या जन्मतारखेच्या रकान्यासमोर त्याची जन्मतारीख लिहली नसून ती रकान्याखाली कुठेतरी लिहली आहे. ती जाणूनबुजून नंतर लिहली गेली आहे जेणेकरून कसाबचं खोटं वय दाखवता यावं.

विशेष सरकारी वकील उज्जवल निकम- स्वाती साठे यांनी जी माहिती जश्या स्वरूपात मिळाली तशी ती नमूद केली. कसाब हा एक महत्वपूर्ण आरोपी आहे, तो जसजशी माहिती देत गेला तसतशी ती नमूद करण्यात आली. (अटक झाल्यानंतर त्याने आपल्याला आईशी बोलायचं असल्याचं सांगितलं होतं आईशी बोलण्यासाठी त्याने मावशीच्या मुलांचे मोबाईल नंबरही दिले होते.) आणि यामुळेच माहिती थोडी वरखाली झाली आहे. कोर्टाने या युक्तीवाद मान्य करत कसाब हा सज्ञान असल्याचा आदेश दिला.

पुरवा बाबांनो माझे चोचले...मला लागले शिक्षेचे डोहाळे...

Wednesday, 29 April 2009

मला हवं परफ्युम...आणि हवी सुगंधित पेस्ट...कसाबचे लाड दिवसेंदिवस वाढतच चाललेत. टाईमपास होत नाही म्हणून कसाबने आता जेलच्या व्हरांड्यात फिरण्याची परवानगी मागतिलीय. इतकंच नाही तर त्याने उर्दू पेपर वाचायला मिळावा अशी विनंतीही कोर्टाला केलीय. कसाबने त्याचे वकील अब्बास काझमी यांच्यामार्फेत त्याच्या या मागण्या कोर्टापुढे ठेवल्या आहेत. कसाबने पत्राद्वारे आपल्या या मागण्या काझमी यांना कळवल्या होत्या. हे पत्र काझमी यांनी कोर्टापुढे ठेवलं. पेपरची मागणी ऐकल्यावर कोर्टाने कसाबला विचारलं तुला कोणता पेपर हवा वाचायला. यावर कसाबने मला उर्दू टाईम्स हवा असं सांगितलं. अटक करतेवेळी माझ्याकडून जी रक्कम जप्त करण्यात आली होती ती आपल्या कारागृहातील खात्यावर जमा करावी अशी मागणीही कसाबने केली आहे. एकाच कक्षात राहून माझे मानसिक संतुलन ढळत चाललंय, आणि त्यामुळे व्हरांड्यात फिरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कसाबने केलीय.

कसाब अक्कल(दाढा)वाला

Tuesday, 28 April 2009


कसाब हा २० वर्षांपेक्षा अधिक म्हणजेच प्रौढ असल्याचा अहवाल जेजे हॉस्पीटलने दिलाय. विशेष कोर्टाने कसाबच्या हाडांची आणि दातांची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. या चाचण्यांमुळे व्यक्तीचं वय कळण्यास मदत होते. हॉस्पीटलने दिलेल्या अहवालात कसाब हा २० वर्षांपेक्षा अधिक वर्षाचा असल्याचं सांगण्यात आलंय. या चाचण्या घेण्यासाठी जेजे हॉस्पीटलच्या चार डॉक्टरांची टीम बनवण्यात आली होती. कसाबच्या अक्कलदाढा पूर्णपणे विकसित झाल्या आहेत तसंच त्याची हाडंही विकसित झाली असल्याचा अहवाल या टीमने दिलाय. कसाब ने कोर्टामध्ये तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यावर पहिले कसाबच्या वकीलांनी आणि नंतर विशेष सरकारी वकीलांनी त्याचं वय निश्चित करण्यात यावं यासाठी कोर्टाला विनंती केली होती. कसाबच्या वकीलांनी या अहवालावर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ आणि रिपोर्ट देणा-या डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असल्याचं सांगितलं ज्यामुळे कोर्टाने बुधवारी म्हणजेच २९ एप्रिलला जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर रहाण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने २८ एप्रिलला आर्थर रोड च्या अधीक्षक स्वाती साठे यांची साक्ष नोंदवून घेतली. कोर्ट डॉक्टरांच्या साक्षीनंतरच कसाब अल्पवीयन आहे की नाही याचा फैसला सुनावणार आहे.

अक्कलदाढेनं कळणार कसाबची अक्कल.....

Friday, 24 April 2009


पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब ‘अल्पवयीन’ आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी कसाबच्या हाडांची आणि दातांची चाचणी करण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांनी रेडियोलॉजिस्ट आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सकांकडून कसाबच्या हाडांची (ऑसिफिकेशन) आणि दातांची चाचणी करण्याचे आदेश तुरूंग प्रशासनाला दिलेत. या चाचणीचा अहवाल २८ एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले. २८ एप्रिल म्हणजेच मंगळवारी कसाबवर सर्वात पहिल्यांदाच उपचार करणारे नायर रुग्णालयाचे डॉक्टर आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. अभियोग पक्षाने एका अर्जाद्वारे कसाबविरुद्ध आरोप निश्चित होण्याआधी त्याच्या वयाबाबतचा मुद्दा निकाली काढण्याची आणि त्याबाबत चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर आज निर्णय देताना न्या. तहलियानी यांनी ज्युविनाईल जस्टीस एक्टच्या कलम ७ (ए) नुसार कसाबच्या अल्पवयीन असण्याच्या दाव्याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी रेडियोलॉजिस्टद्वारे त्याच्या हाडांची आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सक त्याच्या दातांची चाचणी करण्याचेही निर्देश तुरूंग प्रशासनाला दिले. अटकेच्यावेळी जखमी झालेल्या कसाबला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याने स्वत:विषयी माहिती दिली होती. त्यात त्याच्या जन्मतारखेचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे त्याला पहिल्यांदा आर्थर रोड तुरूंगात पाठविण्यात आले तेव्हाही त्याची व्यक्तिगत माहिती तुरूंग प्रशासनाकडून नोंदविण्यात आली होती. यामुळे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी नायर रुग्णालयाच्या कसाबवर उपचार करणा-या डॉक्टरांची आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदवून घेण्याची मागणी केलीय. कोर्टाने ही मागणी मान्य केली असून दोघांना २८ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. कसाब हा अल्पवीयन असल्याचं सिद्ध झालं तर मग हा खटला अल्पवयीन आरोपींसाठी तयार करण्यात आलेल्या कोर्टामध्ये वर्ग करण्यात येईल आणि या कोर्टात कसाबचा गुन्हा सिद्ध झाला तरी त्याला जास्तीत जास्त तीन वर्षच शिक्षा होईल असं कसाबचे अब्बास काझ्मी यांनी म्हटलंय.

वाचाळ उद्योग...

Wednesday, 22 April 2009




महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री ए.आर.अंतुले यांना कोर्टाची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सबाउद्दीन याच्या वकीलांनी या दोघांना फिर्यादीचे साक्षीदार म्हणून कोर्टात हजर केलं जावं अशी मागणी केलीय. दरम्यान विशेष कोर्टाने कसाबला उर्दूमध्ये चार्जशीट मिळणार नाही असं सांगितलंय. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या विधांनामुळे चर्चेत आलेल्या नारायण राणे आणि ए.आर.अंतुले यांना कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून उभं रहावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सबाउद्दीन याचे वकील इजाज नक्वी यांनी कोर्टामध्ये या दोघांना फिर्यादीचे साक्षीदार म्हणून हजर करण्यात यावं अशी मागणी केलीय. उद्योग मंत्री राणे यांनी अतिरेक्यांना राज्यातल्याच कोणत्यातरी व्यक्ती मदत केली असल्याचा आरोप केला होता. तर केंद्रीय मंत्री अंतुले यांनी शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, आणि अशोक कामटे यांची हत्या झाली नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप केला होता. दरम्यान कोर्टाने कसाबच्या वकीलांनी उर्दूमध्ये आरोपपत्र मिळावं यासाठी केलेला अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे कसाबला उर्दूमध्ये चार्जशीट मिळणार नाही. इजाझ नक्वी यांनी कोर्टापुढे सबाउद्दीन याची छळवणूक करणा-या एफ.बी.आय अधिका-यांविरुद्ध कारवाई करावी असा अर्ज केला होता. हा अर्ज नक्वी यांनी मागे घेतलाय. सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टाला कसाब अल्पवयीन आहे की नाही याची चौकशी करून एकदाच काय तो निर्णय घ्यावा म्हणून मागणी केली होती. याबाबतचा निर्णय कोर्टाने २४ तारखेला घेणार आहे.

अर्जच अर्ज....

Tuesday, 21 April 2009

कसाब अल्पवयीन आहे का याची चौकशी करावी आणि हा मुद्दा निकाली काढावा अशी सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टाला केली. सरकारी वकीलांबरोबरच बचाव पक्षाच्या वकीलांनीही कोर्टापुढे पाच अर्ज सादर केले. या अर्जांमध्ये कसाबला उर्दूमध्ये आरोपपत्र देण्यात यावे, इजाज नक्वी यांनी सबाउद्दीन अन्सारीला एफ.बी.आय. अधिका-यांनी मारहाण केली त्याची दखल घ्यावी यासारख्या अर्जांचा समावेश आहे. कसाब अल्पवयीन आहे की नाही असा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी चकाचक शेव्ह करून आलेल्या कसाबकडे बोट दाखवत हा अल्पवयीन वाटत नाही का असा सवाल केला. या अर्जाबाबतची सुनावणी २२ एप्रिल ला ठेवण्यात आली.

आरोपींविरूद्ध ३१२ आरोप प्रस्तावित

Monday, 20 April 2009


मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकीलांनी कोर्टासमोर आरोपींविरुद्ध नेमके किती आरोप आहेत हे सांगितलं. आरोपींविरुद्धचा ३१२ आरोपांचा मसुदा निकम यांनी कोर्टासमोर सादर केला. हा मसुदा बहुधा सर्वात मोठा मसुदा असण्याची शक्यता आहे. या आरोपांमधले मुख्य कोणकोणते आरोप आहेत ते पाहूयात.


१) लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या इशा-यावरून कट रचून भारताविरुद्ध युद्ध पुकारणे

२) कटासाठी समुद्रामार्गे शस्त्रास्त्र आणि स्फोटकांसह बेकायदेशीरपणे भारतात आणणे

३) तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह १६६ जणांचा खून

४) २३४ जणांच्या हत्येचा प्रयत्न

५) स्फोट घडवून किंवा आग लावून सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे


या मुख्य आरोपांशिवाय पासपोर्ट अ‍ॅक्ट, रेल्वे अ‍ॅक्ट, शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा, स्फोटके कायदा या कायद्यांतर्गतही काही आरोप आरोपींविरुद्ध प्रस्तावित आहेत.

परदेशी तज्ञांचीही साक्ष नोंदवण्यात येणार....

Sunday, 19 April 2009


अबू इस्माईल आणि कसाबला खरं तर मलबार हिलवर हल्ला करायचा होता. या हल्ल्याचा प्लॅन फक्त ईस्माईलला माहीत होता. कसाबने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने आपण कुढे जायचंय आणि काय करायचं अशा प्रश्न विचारल्याचं म्हटलंय. याअर्थी प्लॅन फक्त अबू इसामाईललाच माहिती होता हे स्पष्ट होतं. मलबार हिल येथे पोहोचण्यापूर्वीच अबू इस्माईल पोलीस चकमकीत मारला गेला. यामुळे प्लॅन अयशस्वी ठरला. मुंबईवरील हल्ल्यात कसाब आणि त्याच्या साथीदारांचा हात आहे, हे सिद्ध करण्यासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अन्य परदेशी तज्ज्ञांसह १०९ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. साक्षीदारांमध्ये ३० हून अधिक साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांनी कसाब व त्याच्या साथीदारांना हॉस्पिटल, हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बेछूटपणे गोळीबार करताना पाहिलंय. दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये एके-४७ रायफल, आरडीएक्सचे बॉम्ब पेरणे, रॉकेट लॉन्चरचा वापर करणे, जीपीएस सॅटेलाईटचा वापर करणे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते असं विशेष सरकारी वकील उज्वल निकम कोर्टाला सांगितलं. दहशतवाद्यांना सरकारी अधिका-यांची दिशाभूल कशी करायची याचं देखील प्रशिक्षम देण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून कसाब मी ‘बच्चा ’आहे, असा आव आणून कोर्टाची दिशाभूल करत असल्याचं निकम यांनी कोर्टाला सांगितलं. या खटल्यात १२ एफआयआर नोंदविण्यात आलेत.यातील सातमध्ये कसाबचा प्रत्यक्ष सहभाग आहे. कुबेर या बोटीवरील खलाशांची हत्या करणे, सीएसटी स्थानकात बेछूट गोळीबार करणे, टॅक्सीत स्फोट घडविणे, कामा हॉस्पिटलजवळ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करणे, स्कोडा गाडी चोरणे, चौपाटीवर पोलिसांवर गोळीबार करणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी पाच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) उपकरणं हस्तगत केली असून ती विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठविण्यात आली आहेत. यापैकी दोन जीपीएस ताज महाल हॉटेलमधून तर ट्रायडण्ट (ओबेरॉय) आणि नरिमन हाऊस येथून प्रत्येकी एक उपकरण हल्ल्यानंतर हस्तगत करण्यात आले आहे.

अतिरेक्यांचं टार्गेट होतं मलबार हिल

Saturday, 18 April 2009


मुंबईवरील हल्ल्याप्रसंगी पोलिसांच्या तावडीत सापडलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांचा सीएसटीमध्ये गोळीबार करून मलबार हिलचा 'व्हीआयपी' परिसरात गाठण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती शनिवारी म्हणजेच १८ एप्रिल २००९ ला विशेष कोर्टापुढे झालेल्या सुनावणीदरम्यान सामोर आली. मलबार हिल परिसरात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, हायकोर्टाचे न्यायमूर्तींसह विविध महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने आहेत. सीएसटी परिसरात दहशत माजवल्यानंतर हे दोघेजण कामा हॉस्पिटलच्या गल्लीतून नरिमन पाइंटच्या दिशेने गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना गाठायचा होता तो थेट मलबार हिलचा व्हीआयपी परिसर! त्या परिसरात ते नेमके काय करणार होते, हे कदाचित गुलदस्त्यातच राहील. कारण हा व्हीआयपी परिसर गाठण्याचा कट ज्याच्या डोक्यात शिजत होता, तो अबू इस्माईल पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. २६/११च्या हल्ल्याची सुनावणी न्या. एम. एल. तहिलियानी यांच्यापुढे आर्थर रोड तुरुंगातील विशेष कोर्टात सुरू आहे. कसाबचा सहभाग स्पष्ट करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सीएसटी फायरिंगचा उल्लेख केला. या हल्ल्याविषयी तपशीलवार सांगताना कसाबच्या कबुलीजबाबाचा आधार घेत त्यांनी ही बाब उघड केली. सीएटीनंतर तुमचा कुठे जाण्याचा प्लॅन होता, असे कसाबला चौकशीदरम्यान विचारले असता त्याने 'मलबार हिल' असे उत्तर दिले. तिथे काय करणार होता, या प्रश्नावर त्याने इस्माईलचे नाव सांगितले. आपणही इस्माईलला सीएसटीनंतर कुठे जायचे, असे विचारले होते. त्यावर त्याने 'मलबार हिल', असे उत्तर दिले. वहा क्या करना है, असे कसाबने विचारले असता इस्माईलने 'वहा पहुचने के बाद बताऊगा,' असे उत्तर दिले. या खटल्यामध्ये एकूण १,८२० साक्षीदारांपैकी ३३ प्रत्यक्षदर्शी १०३ साक्षीदारच तपासण्यात येणार आहेत. यात एफबीआयच्या काही परदेशी तज्ज्ञांच्या साक्षींचाही समावेश आहे.

कसाब म्हणतो मी तर बच्चाच

Friday, 17 April 2009


१७ एप्रिल ला खटला ख-या अर्थाने सुरू झाला. कामकाज सुरू होताच विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तीवादाची सुरवात केली. ज्यात त्यांनी कसाबवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा मुख्य आरोप ठेवला. काही धक्कादायक माहितीही या दिवशी सर्वांसमोर आली. कसाबने दिलेला कबुली जबाब कोर्टापुढे सादर करण्यात आला. या कबुलीजबाबात कसाबने अतिरेक्यांना ट्रेनिंग सुरू असताना आमिर हफीज सईद आणि जकी उर रहमान लखवीने कश्मीर मुक्त करण्यासाठी आपण भारताविरुद्ध युद्ध पुकारणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असा प्रश्न विचारल्याचं म्हटलंय. याशिवाय अमेरिका ब्रिटन आणि इस्त्राइलला धडा शिकवण्यासाठी या देशांच्या मुंबईत आलेल्या नागरिकांना ठार करण्याचे आदेश मुजाहिदीनांना देण्यात आल्याचं निकम यांनी कोर्टाला सांगितलं. ट्रेनिंगमध्ये मेजर जनरल सहाबने कसाबचं टार्गेट अचूकपणे उध्वस्त केल्याबद्दल कौतुक केल्याचाही उल्लेख कबुलीजबाबात आहे. दुसरीकडे कसाबनेही तो लिंबूटिंबू नसल्याचं दाखवून दिलं. अब्बास काझमी या कसाबच्या वकीलांनी कोर्टापुढे कसाब हा अल्पवयीन असल्याचा अर्ज दाखल केला. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला. (या अर्जामुळे रिपोर्टर्सच्या मनातही शंका निर्माण झाली होती की अशा अर्जांद्वारे खटला लांबतोय की काय, कारण याआधी अनेक खटल्यांमध्ये आरोपींकडून असे हातखंडे अवलंबल्याचं रिपोर्टर्सना माहीत होतं) यानंतर काझमी यांनी कसाबतर्फे कोर्टाला सांगितलं की कसाबला हा कबुलीजबाब माहित नाही आणि तो त्याच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतलाय.(हा पवित्राही काझमी घेणार हे रिपोर्टर्सना ठाऊक होतं, फक्त तो पवित्रा केव्हा घेणार हे माहित नव्हतं) काझमी यांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं. आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी त्यांनी धडपड करायला सुरवात केली आहे, कसाबही या कायद्याच्या खेळात सहभागी होऊन आनंदीत झाल्याचं दिसत होतं.

कसाबला मिळाला नवा वकील

Thursday, 16 April 2009


ज्या दिवशी अंजली वाघमारे यांना कसाबच्या वकील म्हणून खटला लढवता येणार नाही हा निर्णय विशेष कोर्टाने दिला त्याच दिवशी कोर्टाने कसाबसाठी दुसरा वकील देण्याचा निर्णय घेतला. १६ एप्रिल २००९ ला अब्बास काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. काझमी यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यात अमायकस क्यूरी(कोर्टाचा मित्र) म्हणून काम केलं होतं. काही काळ सौदी अरेबियामधील जेद्दाहमध्ये एका कंपनीत काम केल्यानंतर काझमी यांनी पुन्हा मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. के.सी.कॉलेजमधून त्यांनी लॉ केलंय. कसाबचा वकील म्हणून मी यापुढे खटला लढवणार असून, मी माझं कर्तव्य बजावण्यात कुठेही कसूर ठेवणार नाही असं काझमी यांनी स्पष्ट केलं. काझमी जसं बोलले तसं त्यांनी करूनही दाखवलं.

अंजली वाघमारे...

Wednesday, 15 April 2009


अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जेव्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हा त्यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी निदर्शनं केली. वाघमारे यांच्यावर केस घेतल्याने बराच दबाव आला होता. त्यातच के.बी.एन.लाम नावाच्या एका वकीलाने ( या वकील महाशयांनीही कसाबचं वकीलपत्र मिळावं यासाठी हरत-हेचे प्रयत्न केले होते) वाघमारे यांच्याविरुद्ध विशेष कोर्टापुढे एक अर्ज सादर केला. ज्यात अंजली वाघमारे यांनी 26/11 च्या हल्ल्याचे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं वकीलपत्र घेतलं होतं,. लाम यांनी यामुळेच वाघमारे यांच्या नियुक्तीला विरोध केला होता त्यांच्या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की एकच वकील साक्षीदार आणि आरोपीचं वकीलपत्र कसं घेऊ शकतो. या मुद्दावरून विशेष कोर्टाने निर्णय घेतला की अंजली वाघमारे यांना हा खटला कसाबच्या वकील म्हणून लढवता येणार नाही. कोर्टाने तातडीने आदेश दिले की कसाबसाठी नवीन वकील ताबडतोब शोधण्यात यावा. यामुळे नवीन पेच निर्माण झाला की आता कसाबतर्फे केस लढणार कोण ?

आणि खटला सुरू झाला....


26/11 चा हल्ला ज्यांनी पाहिला नाही नुसता ऐकला त्यांना खटला कव्हर करताना तीव्रता कळणार नाही(मात्र असे रिपोर्टर बोटावर मोजता येण्याएतकेच असतील) १५ एप्रिल २००९ ला खटल्याची सुरवात झाली. मी १९९३ चा बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल कव्हर केलाय, तेव्हाचं आणि आत्ताचं कोर्ट यात जमीन अस्मानाचा फरक झालाय. खटला आर्थर रोड तुरुंगात सुरू करण्यात आलाय आणि तुरुंगाभोवती मुंबई पोलिसांबरोबरच इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे जवान सुरेक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. खटला कव्हर करणा-या रिपोर्टर्ससाठी विशेष पास बनवण्यात आले, आणि ९३ ब्लास्ट खटल्याच्या पेक्षा दुप्पट चेकींग हा खटला कव्हर करणा-या रिपोर्ट्सचं होतंय. १९९३ ब्लास्ट चा खटला सुरू झाला तेव्हा आपल्यापैकी अनेकजण पत्रकारितेतही नव्हते. मात्र यावेळी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा खटला आपल्याला जवळून पाहता येणार आहे. हा ब्लॉग सुरू करण्यामागे एकच उद्देश आहे तो म्हणजे तुम्हा आम्हाला मदत व्हावी (जुने रेफरन्स मिळवण्यासाठी) आणि फक्त फिल्डवर आणि आपल्यातच राहणा-या काही बातम्या सगळ्यांबरोबर शेअर करता याव्यात यासाठी

About This Blog

Lorem Ipsum

  © Free Blogger Templates Nightingale by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP